ऋषिकेश भास्कर सांगळे
शहर प्रतिनिधी, श्रीगोंदा
श्रीगोंदा –
श्रीगोंदा शहरातील वडाळी रस्त्यावर फोटोशूटसाठी गेलेल्या तीन तरुणांवर हल्ला करून ३ लाख ३८ हजार रुपयांचा मुद्देमाल लुटणाऱ्या चार आरोपींना श्रीगोंदा पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयाने या आरोपींना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून पुढील तपास सुरू आहे.
दि. ३ जानेवारी रोजी दुपारी साडेचारच्या सुमारास श्रीगोंदा–वडाळी रस्त्यावरील माळरान परिसरात ही घटना घडली होती. एका तरुणीच्या फोनवरून फोटोशूटसाठी बोलावण्यात आलेल्या फोटोग्राफर ओम संतोष शिंदे व त्यांचे मित्र अजय दिलीप बोके आणि अनिकेत अंबादास धोत्रे हे ठिकाणी गेले असता, विना नंबरच्या काळ्या रंगाच्या बुलेट व चारचाकी वाहनातून आलेल्या चार अनोळखी इसमांनी त्यांच्यावर हल्ला केला होता.
आरोपींनी शिवीगाळ करत लाथा-बुक्क्यांनी, प्लास्टिक पाईप व लोखंडी रॉडने तिघांना बेदम मारहाण केली.
त्यानंतर कॅनॉन कंपनीचा सुमारे ३ लाख रुपये किमतीचा कॅमेरा (सिग्मा ८५ एम.एम. लेन्ससह) व ३८ हजार रुपये रोख रक्कम असा एकूण ३ लाख ३८ हजार रुपयांचा मुद्देमाल जबरदस्तीने हिसकावून नेला होता.
या प्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत प्रसाद ताताराम झराड (वय २५), शक्तिक बिभीषण कराळे (वय २२), विनायक गौतम दांगडे (वय २२) आणि युवराज सुनील पठारे (वय २१) या चार आरोपींना ताब्यात घेतले आहे.
पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू असून आरोपींकडून लुटलेला मुद्देमाल हस्तगत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, श्रीगोंदा पोलीस प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की,
“महाविद्यालयीन युवक-युवतींनी फोटोशूट, सोशल मीडिया ओळखी व अनोळखी व्यक्तींच्या संपर्काबाबत विशेष सावधगिरी बाळगावी.”
Bhoomi online certification of Maharashtra भूमिहीन शेतमजूर असल्याचा दाखला असा करा ऑनलाईन अर्ज

