
अकोले, दि.१८ डिसेंबर, प्रतिनिधी
राज्यातील आदिवासी विकास महामंडळाने अद्याप हिरडा ,बेहडा,धान खरेदी वर्ष उलटूनही सुरू केली नाही.
राजूर येथील उपप्रादेशिक आदिवासी विकास महामंडळ कार्यालयात आमच्या प्रतिनिधीने चौकशी केली असता तेथील ओ. एस. एन. एम .रजपूत यांनीही शासनाने निधी वर्ग केला नाही. त्यामुळे खरेदी करता येत नाही .खरेदी चे आदेश व निधी आल्यावर खरेदी सुरू होईल .तर यावर्षी प्रथमच धान खरेदी होणार असून त्याला १८६८भाव तर हिरडा बेहडा १५ रुपयाने खरेदी करू तर बाळ हिरडा देखील त्याच भावात घेतला जाईल.
त्यामुळे खरेदी सुरू झाली तरी शेतकऱ्यांना योग्य भाव मिळणे अशक्य असल्याने शेतकऱ्यांनी आपला मालं व्यापारी वर्गाला देणे पसंद केले आहे .त्यामुळे व्यापारी वर्गाची चांदी असल्याचे चित्र आहे .मात्र शेतकरी राजाचे आई भिक मागू देईना व बाप खाऊ देईना अशी गत झाली आहे .
सरकार म्हणजे आदिवासी महामंडळ निधी आल्यावर खरेदी करू म्हणतात तर व्यापारी भाव अधिक देत असले तरी काट्यात गडबड असल्याने शेतकरी वर्ग मेटाकुटीला आला आहे . प्रादेशिक व्यवस्थापक एस. बी. पाटील यांनी याबाबत बोलताना सांगितले की.आमची खरेदीची तयारी झाली असून निधीसाठी वरिष्ठ कार्यालयाकडे मागणी सुरू असून निधी प्राप्त झाल्यावर हिरडा बेहडा खरेदी सुरू होईल.तर धान खरेदी तालुक्यात प्रथमच होत असून शेतकऱ्यांचे आयसीआयसीआय बँकेत खाते उघडून त्याचा लॉगिन पासवर्ड मिळेल. मग शेतकऱ्याच्या खात्यात दोन दिवसांनी पैसे वर्ग होतील या प्रक्रियेला वेळ लागत असल्याने उशीर होत आहे .
मात्र असे असले तरी बँक तालुक्यात नाही त्यात खाते शेतकरी कधी उघडणार त्यामुळे सरकारची मेहरबानी कशाला असा सवाल शेतकरी व आदिवासी शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष सुरेश भांगरे यांनी करून आठ दिवसात रोख पैसे देऊन माल खरेदी केला नाही तर आदिवासी विकास महामंडळ कार्यालयासमोर आंदोलन छेडू असा इशारा दिला आहे .

