पंतप्रधान मोदी यांनी साधला अविनाश साबळे सह आशियाई विजेत्या खेळाडूंशी संवाद

PM Modi interacts with contingent of Indian Athletes
PM Modi interacts with contingent of Indian Athletes

 

 

in article

 

नवी दिल्ली,

PM Modi interacts with contingent of Indian Athletes पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीतील मेजर ध्यानचंद स्टेडियममध्ये आशियाई क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये सहभागी झालेल्या भारतीय खेळाडूंना संबोधित केले आणि त्यांच्याशी संवादही साधला.या मध्ये बीड जिल्ह्यातील avinash sable अविनाश साबळे याचा समावेश होता. भारताने आशियाई क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये 28 सुवर्ण पदकांसह 107 पदके जिंकली ज्यामुळे खंडीय  बहु-क्रीडा स्पर्धेत जिंकलेल्या एकूण पदकांच्या संख्येच्या दृष्टीने ही सर्वोत्तम कामगिरी ठरली.

पंतप्रधान मोदी यांनी सर्व क्रीडा प्रकारामध्ये यश मिळविलेल्या खेळाडूना हात जोडले. तसेच त्यांच्याशी संवाद साधला.

२९ वर्षीय अविनाश साबळे यांनी चीन मधील हांगझू येथे सुरु असलेल्‍या आशियाई क्रीडा स्पर्धेत ३००० मीटर स्टीपलचेसमध्ये ८:१९.५० सेकंदात शर्यत पूर्ण करुन राष्ट्रीय विक्रम केला आहे, त्‍यांनी सन २०१८ च्या जकार्ता गेम्समध्ये इराणच्या होसेन केहानीने बनवलेला ८ मिनिटे आणि २२.७९ सेकंदांचा मागील आशियाई क्रीडा विक्रम मोडला आहे. ते ऍथलेटिक्समध्ये सुवर्णपदक जिंकणारे पहिले भारतीय खेळाडू ठरले असून  त्‍यांनी ५ हजार मीटर शर्यती‍त रौप्‍य पदक‍ही मिळविले आहे.

खेळाडूंना संबोधित करताना पंतप्रधानांनी प्रत्येक नागरिकाच्या वतीने त्यांचे स्वागत केले आणि त्यांच्या यशाबद्दल त्यांचे अभिनंदन केले. 1951 मध्ये याच स्टेडियममध्ये आशियाई क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन झाले होते, हा एक सुखद योगायोग असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. खेळाडूंनी दाखविलेला   दृढनिश्चय देशाच्या कानाकोपऱ्यात उत्सवाच्या स्वरूपात प्रतीत झाल्याचे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. 100 हून अधिक पदकांचे लक्ष्य साध्य करण्यासाठी घेतलेल्या परिश्रमाची दखल घेत संपूर्ण देश अभिमानाची भावना अनुभवत आहे यावर पंतप्रधानांनी भर दिला. त्यांनी कोच आणि प्रशिक्षकांचे अभिनंदन केले आणि फिजिओ आणि अधिकाऱ्यांचे त्यांच्या योगदानाबद्दल कौतुक केले. पंतप्रधानांनी सर्व खेळाडूंच्या पालकांना अभिवादन केले आणि कुटुंबांनी दिलेल्या योगदान आणि त्यागावर प्रकाश टाकला. “प्रशिक्षण मैदानापासून ते क्रीडांगणापर्यंतचा प्रवास पालकांच्या पाठिंब्याशिवाय अशक्य आहे”, असे पंतप्रधान म्हणाले.

पंतप्रधान म्हणाले, तुम्ही इतिहास घडवला आहे. या आशियाई क्रीडा स्पर्धेची आकडेवारी भारताच्या यशाची साक्षीदार आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेतील भारताची ही आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी आहे. आम्ही योग्य दिशेने वाटचाल करत आहोत ही वैयक्तिक समाधानाची बाब आहे.” कोरोना लसीचा पाठपुरावा करताना घेतलेल्या शंकांची त्यांनी आठवण करून दिली आणि सांगितले की, जेव्हा आपण प्राण वाचवण्यात आणि 250 देशांना मदत करण्यात यशस्वी झालो, तेव्हा योग्य दिशेने वाटचाल करण्याची हीच भावना अनुभवायला मिळाली.

आतापर्यंतची सर्वोच्च पदकतालिका लक्षात घेऊन नेमबाजी, तिरंदाजी, स्क्वॅश, रोइंग, महिला मुष्टियुद्ध ,  महिला आणि पुरुष क्रिकेट स्पर्धा, स्क्वॅश मिश्र दुहेरीतील पहिले सुवर्णपदक मिळाल्याचा  उल्लेख पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. महिलांची  गोळाफेक स्पर्धा  (72 वर्षे), 4×4 100 मीटर (61 वर्षे), घोडेस्वारी  (41 वर्षे) आणि पुरुष बॅडमिंटन (40 वर्षे) या क्रीडा प्रकारांमध्‍ये  प्रदीर्घ कालावधीनंतर  मिळालेल्या  पदकांचे  महत्त्वही त्यांनी अधोरेखित केले. “तुम्ही केलेल्या  प्रयत्नांमुळे अनेक दशकांची प्रतीक्षा यंदा संपली”, असे  पंतप्रधान म्हणाले.

आशियाई सुवर्ण पदक विजेता अविनाश साबळे साई दरबारीं

भारताने भाग घेतलेल्या जवळपास सर्व खेळांमध्ये पदके जिंकल्यामुळे देशाचा ‘कॅनव्हास’ चांगलाच विस्तारत असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले. कमीत कमी 20 क्रीडा प्रकार  असे होते,  त्यामध्‍ये  भारताला आत्तापर्यंत कधीच विजेत्याच्या ‘पोडियम’पर्यंत जाता  आले नव्हते. “तुम्ही पदक मिळवून नुसतेच खाते उघडले नाही तर तरुण पिढीला प्रेरणा देणारा मार्ग दाखवला. तो मार्ग आता आशियाई खेळांच्या पलीकडे जाईल आणि ऑलिम्पिकच्या दिशेने  आपल्या जी वाटचाल सुरू झाली आहे, त्यासाठी  नवा आत्मविश्वास देईल. ” असेही पंतप्रधान पुढे म्हणाले.

महिला खेळाडूंनी दिलेल्या योगदानाबद्दल पंतप्रधानांनी अभिमान व्यक्त केला.  यामुळे भारतीय  मुलींमध्‍ये असलेल्या प्रचंड क्षमता अधोरेखित झाल्या  असल्याचे त्यांनी सांगितले. पंतप्रधानांनी  माहिती दिली की,  जिंकलेल्या सर्व पदकांपैकी अर्ध्याहून अधिक महिला खेळाडूंनी जिंकली आहेत. स्पर्धेमध्‍ये  महिला क्रिकेट संघानेच यशाची मालिका  सुरू केली, असे ते म्हणाले. तसेच  मुष्टीयुद्धात  सर्वाधिक पदके महिलांनी जिंकल्याचे त्यांनी नमूद केले.  महिला ऍथलेटिक्स संघाने दाखवलेल्या  प्रभावी कामगिरीचे पंतप्रधान मोदी यांनी  कौतुक केले.   “‘ट्रॅक आणि फील्ड इव्हेंट’ मध्ये भारताच्या मुली सर्वोच्च क्रमांकापेक्षा  इतर कोणत्याही गोष्‍टींवर  समाधान मानायला तयारच नाहीत.  ‘’ असे सांगून पंतप्रधान म्हणाले, “ही नव्या  भारताची भावना आणि शक्ती आहे.”पंतप्रधानांनी अधोरेखित केले की, स्पर्धा संपल्याची  अंतिम शिट्टी वाजत नाही आणि विजेते निश्चित होत नाही,  तोपर्यंत हा  नवीन भारत कधीही आपले प्रयत्न सोडत नाही. “नवा भारत प्रत्येक वेळी सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करतो”,  असेही त्‍यांनी नमूद केले.

पंतप्रधान म्हणाले की, भारतात कधीही प्रतिभेची कमतरता नव्हती आणि खेळाडूंनी भूतकाळात चांगली कामगिरी केली होती, तथापि, अनेक आव्हानांमुळे आपण पदकांच्या बाबतीत मागे पडलो.  क्रीडा क्षेत्राच्या आधुनिकीकरणासाठी  आणि परिवर्तनासाठी 2014 नंतर हाती घेतलेल्या उपक्रमांची आणि केलेल्या प्रयत्नांची माहिती दिली. ते म्हणाले की,  क्रीडापटूंना सर्वोत्तम प्रशिक्षण सुविधा उपलब्ध करून देणे, खेळाडूंना जास्तीत जास्त राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रदर्शन करता येईल, अशा संधी प्रदान करणे, निवडीमध्‍ये  पारदर्शकता सुनिश्चित करणे आणि ग्रामीण भागातील प्रतिभेला जास्तीत जास्त संधी देणे,  असा  भारताचा प्रयत्न आहे. 9 वर्षांपूर्वीच्या तुलनेत क्रीडा क्षेत्राच्या निधीत तिपटीने  वाढ करण्यात आल्याची माहिती पंतप्रधानांनी दिली. “आमच्या ‘टॉप्स’  आणि ‘ खेलो इंडिया’  योजना गेम चेंजर ठरल्या आहेत”,  ‘खेलो गुजरात’  या उपक्रमामुळे  राज्यामध्‍ये  क्रीडा संस्कृती निर्माण होऊन ,  क्रीडा क्षेत्रामध्‍ये पूर्णपणे परिवर्तन घडून आले,  याची   आठवण करून देताना पंतप्रधान म्हणाले,   या एशियाड  समूहातील सुमारे 125 खेळाडू हे ‘खेलो इंडिया’  मोहिमेतून  शोधलेले  आहेत. आणि विशेष म्हणजे  त्यांच्यापैकी 40 हून अधिक खेळाडूंनी पदके जिंकली आहेत. “खेलो इंडिया खेळाडूंचे यश  या मोहिमेची दिशा योग्य असल्याचे दर्शवत आहे”.  खेलो इंडिया अंतर्गत 3000 हून अधिक खेळाडूंना प्रशिक्षण दिले जात असल्याची माहिती त्यांनी दिली. या खेळाडूंना दरवर्षी 6 लाख रुपयांपेक्षा जास्त शिष्यवृत्ती मिळत आहे. “या योजनेंतर्गत आता खेळाडूंना सुमारे 2.5 हजार कोटी रुपयांची मदत देण्यात आली आहे. मी तुम्हाला खात्री देतो की, पैशाची कमतरता हा तुमच्या  प्रयत्नांमध्ये कधीही अडथळा ठरणार नाही. सरकार येत्या पाच वर्षांत तुमच्यासाठी आणि खेळांसाठी आणखी 3  हजार कोटी रुपये खर्च करणार आहे. आज देशाच्या कोनाकोपऱ्यात फक्त तुमच्यासाठी आधुनिक क्रीडा पायाभूत सुविधा निर्माण केल्या जात आहेत,” असेही  मोदी पुढे म्हणाले.

पदक विजेत्यांमध्ये तरुण खेळाडूंच्या योगदानाबद्दल  पंतप्रधानांनी आनंद व्यक्त केला. “हे क्रीडासंस्कृती असलेल्या  राष्ट्राचे सुचिन्ह आहे असे सांगत हे नवे युवा विजेते देशासाठी दीर्घकाळ  चमकदार कामगिरी करतील.  तरुण भारताचा नवा विचार आता केवळ चांगल्या कामगिरीवर समाधानी राहणार नाही तर या पलीकडे जाऊन त्याला  त्याला पदके आणि विजय हवे आहेत, असे ते म्हणाले.

“देशासाठी, तुम्ही ‘ग्रेटेस्ट ऑल टाईम’  ( GOAT -)  म्हणजेच ‘सर्वकालीन सर्वोत्कृष्ट”, आहात असे पंतप्रधान तरुण पिढीची   भाषा लक्षात घेऊन म्हणाले. खेळाडूंची प्रचंड आवड , निष्ठा  आणि खेळाडूंच्या  बालपणीच्या कथा प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहेत, असे त्यांनी सांगितले.  खेळाडूंचा युवा पिढीवर होणारा प्रभाव अधोरेखित करताना पंतप्रधानांनी खेळाडूंनी अधिकाधिक तरुणांशी जोडून या सकारात्मक ऊर्जेचा चांगला वापर करावा यावर  भर दिला.खेळाडूंनी शाळांना भेट द्यावी आणि मुलांशी संवाद साधावा, या त्यांच्या सूचनेची आठवण करून देत , अंमली पदार्थांच्या  दुष्परिणामांबद्दल आणि ते कारकीर्द  आणि आयुष्य कशाप्रकारे  उद्ध्वस्त करू शकतात याबद्दल युवकांमध्ये जागृती करावी असे आवाहन पंतप्रधानांनी केले. देश अंमलीपदार्थांविरुद्ध निर्णायक लढा देत आहे याकडे त्यांनी लक्ष वेधले आणि खेळाडूंना जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा अंमली पदार्थ आणि अपायकारक   द्रव्यांच्या  दुष्परिणामांबद्दल बोलावे असे त्यांनी सांगितले. अंमली पदार्थांविरुद्धच्या लढ्याला  बळ देण्यासाठी आणि अंमली पदार्थमुक्त भारताच्या मोहिमेसाठी खेळाडूंनी पुढे यावे, असे आवाहन त्यांनी केले.

पंतप्रधानांनी तंदुरुस्तीसाठी सुपर-फूड्सचे म्हणजेच पौष्टीक आहाराचे महत्त्वही अधोरेखित केले आणि खेळाडूंनी देशातील मुलांमध्ये पौष्टिक आहाराला प्राधान्य देण्याबाबत जागरुकता वाढवण्याचे आवाहन केले.त्यांनी मुलांशी संवाद साधावा  आणि खाण्याच्या योग्य सवयींबद्दल बोलावे असे आग्रहपूर्वक सांगत भरडधान्य चळवळ आणि पोषण अभियानामध्ये  खेळाडू मोठी भूमिका बजावू शकतात  असे ते म्हणाले.

पंतप्रधानांनी क्रीडा क्षेत्रातील यशांना राष्ट्रीय यशाच्या मोठ्या पटलाशी जोडले. “आज भारत जागतिक स्तरावर महत्त्वाचे स्थान मिळवत असताना तुम्ही क्रीडा क्षेत्रातही ते दाखवून दिले आहे.आज जेव्हा भारत जगातील अव्वल -3 अर्थव्यवस्था बनण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे, तेव्हा आपल्या तरुणांना त्याचा थेट लाभ होत आहे ”, यावर त्यांनी भर दिला. त्यांनी अंतराळ, स्टार्टअप्स, विज्ञान आणि तंत्रज्ञान आणि उद्योजकतेमध्ये मिळालेल्या सारख्याच  यशाचा उल्लेख केला. “भारतातील युवा क्षमता प्रत्येक क्षेत्रात दिसून येते”, असे ते म्हणाले.

“देशाचा तुम्हा  सर्व खेळाडूंवर प्रचंड विश्वास आहे”, असे पंतप्रधानांनी यंदाच्या आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी केलेल्या  ‘100 पार’ या घोषणेचा उल्लेख करताना  अधोरेखित केले.पुढच्या आशियायी क्रीडा  स्पर्धांमध्ये   हा पदकांचा  विक्रम आणखी वाढेल असा विश्वास मोदी यांनी  व्यक्त केला. पॅरिस ऑलिम्पिक अगदी जवळ आल्याचे अधोरेखित करून पंतप्रधानांनी खेळाडूंना  परिश्रमपूर्वक तयारी करण्याचे आवाहन केले.यावेळी यश न मिळालेल्या सर्वांना धीर देत  त्यांनी आपल्या चुकांमधून शिकून नवीन प्रयत्न करण्याची सूचना पंतप्रधानांनी केली.  22 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या पॅरा आशियाई क्रीडा स्पर्धेतील सर्व खेळाडूंना पंतप्रधानांनी  शुभेच्छा दिल्या.

यावेळी केंद्रीय युवा आणि क्रीडा व्यवहार मंत्री अनुराग सिंह ठाकूर उपस्थित होते.

 

पार्श्वभूमी

आशियाई क्रीडा स्पर्धा 2022 मधील उत्कृष्ट कामगिरीबद्दल खेळाडूंचे अभिनंदन करण्याचा आणि त्यांना भविष्यातील स्पर्धांसाठी प्रेरित करण्याचा पंतप्रधानांचा हा कार्यक्रम आहे. भारताने आशियाई क्रीडास्पर्धा  2022 मध्ये  28 सुवर्ण पदकांसह एकूण 107 पदके जिंकली. जिंकलेली एकूण पदके लक्षात घेता भारताची आशियाई क्रीडा स्पर्धांमधील  ही सर्वोत्तम कामगिरी आहे.

या कार्यक्रमाला आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी  भारतीय चमूतील खेळाडू, त्यांचे प्रशिक्षक, भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे अधिकारी, राष्ट्रीय क्रीडा महासंघांचे प्रतिनिधी आणि युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाचे अधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here