आष्टी (बीड): आष्टी तालुक्यातील शेतकऱ्यांची “कामधेनु” समजली जाणारी कडा (महेश) सहकारी साखर कारखाना सुरू करण्यासाठी गाळप परवान्यासाठी माजी आमदार भीमराव धोंडे हे उद्या ३१ ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करणार आहेत. या आंदोलनाची घोषणा त्यांनी पत्रकार परिषदेत केली.
गाळप परवाना रद्द केल्याचा आरोप
धोंडे यांनी सांगितले की, तालुक्यातील खाजगी कारखान्याला परवानगी दिल्यानंतर सरकारने कडा सहकारी साखर कारखान्याचा गाळप परवाना रद्द केला. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत असल्याचे त्यांनी नमूद केले.
२०१३ पासून कारखाना बंद
कडा सहकारी साखर कारखाना २०१३ पासून बंद आहे. २०१८ मध्ये विद्यमान संचालक मंडळाने हा कारखाना शिखर बँकेकडून भाडेतत्त्वावर घेऊन सुरू करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र गाळप परवाना न मिळाल्यामुळे तो प्रयत्न अपूर्ण राहिला.
कारखाना सुरू करण्याचे नवे प्रयत्न
सध्या विद्यमान संचालक मंडळ पुन्हा एकदा कारखाना सुरू करण्यासाठी प्रयत्नशील आहे. परिसरात स्वच्छता व दुरुस्तीची कामे सुरू असून, कामगार निवास व विश्रामगृहाची दुरुस्ती सुरू आहे. गाळप परवाना मिळताच यंत्रसामग्रीची दुरुस्ती करून कारखाना सुरू करण्याचा मानस आहे.
शेतकऱ्यांत उत्सुकता आणि रोजगाराची अपेक्षा
कडा कारखान्याच्या कार्यक्षेत्रात ऊस उपलब्ध असल्याने शेतकरी वर्ग हा कारखाना केव्हा सुरू होईल याकडे उत्सुकतेने पाहत आहे. हा कारखाना सुरू झाला तर शेकडो स्थानिकांना रोजगार मिळेल आणि आष्टी मतदारसंघातील महत्त्वाची सहकारी संस्था पुन्हा सक्रिय होईल.
सहकारी संस्थांच्या पुनरुत्थानाची गरज
गेल्या काही वर्षांत आष्टी तालुक्यातील अनेक सहकारी संस्था निष्क्रिय झाल्या आहेत. आता कडा साखर कारखाना सुरू झाल्यास शेतकऱ्यांना आर्थिक बळकटी मिळेल आणि सहकार क्षेत्रात पुन्हा विकासाची नवी संधी निर्माण होईल, अशी आशा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

