जनहिताच्या मागण्याबाबत सरकारची दुटप्पी भूमिका-कॉ. एड.अजय बुरांडे
परळी / प्रतिनिधी
पीक विमा, कर्ज माफी व गायरान जमिनी याबाबत सरकारची दुटप्पीपणा उघड उघड जनतेसमोर येत असून एकीकडे गायरान जमिनी कसनाऱ्या भूमीहीन शेत मजुरांना देण्याची घोषणा करत असतानाच वर्षानुवर्षे गायरान जमिनी कसून आपली उपजीविका भागविण्या-या शेतमजूराच्या जमिनी खाजगी सौर वीज निर्मिती कंपनीच्या घशात घालण्यासाठी शेत मजुरांना रस्त्यावर आणण्याचे काम सत्ताधारी करत आहेत.
हमी भाव, कर्ज माफी, विविध अनुदान याबाबत सगळी पोकळ आश्वासन सरकारकडून देण्यात येत असून प्रत्यक्षात मात्र शून्य कार्यवाही होत असल्याने सर्व सामान्यांच्या जिवन मरणाचा प्रश्न बिकट बनत जात आहे.
जनसामान्यांचे प्रश्न तात्काळ दूर करून त्यांना दिलासा द्यावा यासह इतर मागण्यांसाठी तालुक्यातील सिरसाळा या ठिकाणी करण्यात आलेल्या निदर्शने प्रसंगी कॉ. एड.अजय बुरांडे यांनी सरकारच्या भूमिकेवर संताप व्यक्त केला.
पिकविम्यापासून सर्व वंचित शेतकऱ्यांना ताबडतोब पिक विमा वितरित करण्यात यावा, सर्व शेतकऱ्यांचे सरसकट संपूर्ण पीककर्ज माफ करावे, गायरान जमिनीतील राहती घरे नावावर करणे व कसणाऱ्या जमिनी धारकांच्या नावे करण्या बाबत व गायरान जमिनीतील राहती घरे सौर ऊर्जा निर्मितीसाठी खाजगी कंपनीला देण्यासाठी उठवून त्या नागरीकांना भूमिहीन व बेघर करण्याचा घाट घातला जात आहे तो त्वरित बंद करावा व उलटपक्षी त्या गायरान जमिनीवर लोकांची घरे व जमिनी त्यांच्या नावावर कराव्यात या मागण्या घेत अखिल भारतीय किसान सभेकडून तालुक्यातील सिरसाळा येथील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक या ठिकाणी जाहीर निदर्शने करण्यात आली.
या निदर्शने प्रसंगी किसान सभेचे जिल्हा सचिव कॉ. मुरलीधर नागरगोजे, कॉ. भगवान बडे, कॉ. पप्पू देशमुख, कॉ.मुक्तेश्वर कडभाने, कॉ. रुस्तुम माने,कॉ. मदन वाघमारे, कॉ प्रकाश उजगरे, कॉ.गंगाधर पोटभरे, कॉ.विष्णू देशमुख,कॉ. बळीराम देशमुख
यांच्यासह असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.