लिंबागणेश:
helistorm crop damage बीड तालुक्यातील लिंबागणेश परिसरात बुधवारी व गुरुवारी २ दिवस झालेल्या वादळी वाऱ्यासह गारपिटीमुळे पोखरी (घाट) येथील शेतकरी दादासाहेब खिल्लारे यांच्या कलिंगड पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. या घटनेची पाहणी करण्यासाठी आज, शुक्रवार (दि.२०) रोजी आमदार संदीप क्षीरसागर यांच्यासह तहसीलदार चंद्रकांत शेळके व संबंधित अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली.
यावेळी राजेंद्र मस्के (जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी), तहसीलदार चंद्रकांत शेळके, मंडळ अधिकारी पंडीत नाईकवाडे, तलाठी प्रमोद कोळपकर, तलाठी गणपत पोतदार, कृषी सहायक रामेश्वर पेजगुडे, महसूल सेवक ललित काकडे तसेच सरपंच बिभिषण मुळीक उपस्थित होते. त्यांनी नुकसानग्रस्त कलिंगड पिकाची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला.
दरम्यान, शेतकरी दादासाहेब खिल्लारे यांनी सांगितले की, दीड एकर क्षेत्रावर सुमारे दीड लाख रुपये खर्च करून कलिंगड लागवड करण्यात आली होती. गेल्या वर्षी याच पिकातून सुमारे साडेचार लाखांचे उत्पन्न मिळाले होते. मात्र यावर्षी ऐन बहरात आलेले पीक गारपिटीमुळे पूर्णपणे वाया गेले आहे.
या पार्श्वभूमीवर महसूल प्रशासनाने वस्तुनिष्ठ पंचनामे करून तातडीने नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

