ऋषिकेश भास्कर सांगळेशहर प्रतिनिधी, श्रीगोंदा
श्रीगोंदा – श्रीगोंदा नगरपरिषदेत सत्तांतर झाले, नवे चेहरे सत्तेवर आले; मात्र सामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न अद्यापही दुर्लक्षितच असल्याचे चित्र दिसत आहे. शहरात भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव गंभीर बनत चालला असून, आता या प्रश्नावर थेट जाब विचारला जात आहे.
प्रभाग क्रमांक ६ मध्ये एका महिलेला भटक्या कुत्र्यांनी चावा घेतल्याची धक्कादायक घटना घडली असून, या घटनेनंतर शहरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ६ मधून नगरसेवक पदासाठी निवडणूक लढवलेले विकी हनुमंत उदमले यांनी नगरपरिषद प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर तीव्र प्रश्न उपस्थित केले आहेत.
“निवडणुकीचे गुलाल आणि सत्काराचे हार बाजूला ठेवा. ज्या जनतेने तुम्हाला निवडून दिलं, तीच जनता आज रस्त्यावर असुरक्षित आहे,” असा स्पष्ट सवाल विकी उदमले यांनी उपस्थित केला आहे. शहरात भटक्या कुत्र्यांच्या टोळक्यांमुळे महिला, लहान मुले आणि वृद्ध नागरिक भयभीत झाले असून, प्रशासन मात्र अद्याप ठोस पावले उचलताना दिसत नसल्याची टीका त्यांनी केली.
भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर केवळ कागदोपत्री निर्बिजीकरणाच्या योजना दाखवून वेळकाढूपणा केला जात असल्याचा आरोप करत, प्रत्यक्ष आणि परिणामकारक उपाययोजना तात्काळ राबवाव्यात, अशी मागणी त्यांनी केली आहे.“आज एका महिलेला चावा घेतला गेला आहे. उद्या एखाद्या लहान मुलाचा जीव जाण्याची वाट पाहणार आहात का?” असा थेट प्रश्न उपस्थित करत, सत्तांतरानंतरही परिस्थिती बदलली नसेल तर त्याला जबाबदार कोण, असा सवाल विकी उदमले यांनी केला.
या घटनेनंतर नगरपरिषद प्रशासन काय भूमिका घेते आणि भटक्या कुत्र्यांच्या प्रश्नावर तातडीची कारवाई होते का, याकडे श्रीगोंदेकरांचे लक्ष लागले आहे.
विकी उदमले काय म्हणाले?
“ही कोणतीही राजकीय टीका नाही, तर जनतेच्या सुरक्षिततेचा प्रश्न आहे.”“नगरपरिषदेच्या सुशोभिकरणापेक्षा नागरिकांचे प्राण महत्त्वाचे आहेत.”“२ ते ४ दिवसांत ठोस कारवाई झाली नाही, तर जनतेचा उद्रेक रोखता येणार नाही.”“आज महिला जखमी झाली आहे, उद्या एखाद्या लहान मुलाचा बळी जाऊ नये, हीच अपेक्षा.”