मुंबई दि. ११ जून –
Nationalist congress party 27th anniversary आपली एकजूट… आपली एकनिष्ठा आणि आपले कष्ट याचमुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे भविष्य अधिक उज्ज्वल होणार आहे. त्यामुळे आपण सर्वांनी नव्या जोमाने आत्मविश्वासाने आणि नव्या निर्धाराने कामाला लागुया…
असे आवाहन करतानाच वादळाला पाहून आम्ही आमची गलबते कधी वळवली नाही… संकटाना सामोरे जाताना आम्ही आमची पाऊले कधी रोखली नाही… घड्याळाच्या काट्यांच्या हा प्रवास आता थांबणार नाही संघर्षाच्या या रणांगणात राष्ट्रवादी कधीही मागे हटणार नाही असा स्पष्ट इरादा राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या २७ व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात स्पष्ट केला.
स्वाभिमानातून आपल्या पक्षाची स्थापना झाली आहे. शरद पवारसाहेब, अजितदादा आदींसह पक्षाचे ज्येष्ठ नेत्यांसह ज्ञात – अज्ञात व्यक्तीचे पक्षाच्या जडणघडणीत योगदान आहे. आदरणीय दादा आपल्यात नाहीत. त्यांच्या पश्चात होणारा हा पहिलाच वर्धापन दिन आहे.
नव महाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या सुसंस्कृत राजकारणाचा वारसा सर्वांना लाभला आहे. या महापुरूषांच्या विचारांचा वारसा घेऊनच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाटचाल करत आहे. आदरणीय दादांना जो विकसित महाराष्ट्र अभिप्रेत होता तसाच महाराष्ट्र उभा करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रत्येक कार्यकर्ता कटिबद्ध राहिल असा विश्वास सुनेत्रा अजित पवार यांनी व्यक्त केला.
शिव-शाहू- फुले – आंबेडकरांच्या विचाराची राष्ट्रवादी काँग्रेसची जी विचारधारा आहे ती पुढे घेऊन जाणं याचाच अर्थ सर्वांना सोबत घेऊन जाणं आहे. देशाचा स्वातंत्र्य लढा असेल किंवा संयुक्त महाराष्ट्राचे आंदोलन असेल इथल्या तळागाळातील प्रत्येक घटकांनी अठरापगड जातींनी मोलाचे योगदान दिले आहे.
देशाच्या आणि राज्याच्या लढयामध्ये कुठलाही समाज मागे नव्हता याची जाणीव आपण सर्वांनी सतत ठेवायला हवी असेही सुनेत्रा पवार म्हणाल्या.
आजच्या वर्धापन दिनाची समर्पण संघर्ष आणि संकल्प अशी थीम होती. ही संकल्पना आदरणीय दादांना समर्पित केली आहे. आदरणीय दादांनी राज्याच्या विकासासाठी आणि पक्षाच्या बळकटीसाठी अनेक वर्षे पूर्णपणे स्वतः ला समर्पित केले होते. आणि म्हणूनच आपण सुरुवातीलाच आदरणीय दादांसाठी समर्पणाची भूमिका घेतली होती.
राज्याच्या प्रगतीसाठी त्यांनी सातत्याने संघर्ष केल्याचे पहायला मिळाले आणि तो आपल्या समोर आहे. दादांची कामाची पद्धत कुणालाही नवीन नव्हती. त्यांचा संघर्ष ही पाहिला आहे. दादांनी प्रत्येक समाजातील प्रत्येक घटकाला प्राधान्य दिले. शेतकरी, कामगार, युवक, महिला, उद्योजक आणि वंचित घटकांना न्याय द्यावा त्यांना प्रगतीच्या नवीन संधी मिळाव्यात म्हणून दादांनी अहोरात्र प्रयत्न केले हे ज्ञात आहे.
राज्याला देशाच्या सर्वोच्च स्थानी नेण्यासाठी प्रत्येक घटकाचा सर्वांगिण विकास करण्याचा त्याचा मानस होता. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसला अधिक बळकटी देऊन संघटना अधिक रचनात्मक करण्याचा त्यांचा संकल्प होता. आणि हाच संकल्प आपणा सर्वांना पुढे न्यायचा आहे असेही सुनेत्रा अजित पवार यांनी सांगितले.
आदरणीय दादांनी पक्ष संघटना मजबूत करताना आणि कार्यकर्त्याना बळ देतानाच लोकहितासाठी अविरत कष्ट घेतले. पक्ष शिस्तीवर त्यांचा असलेला कटाक्ष निर्णयक्षमता नेतृत्व कार्यकर्त्यांवरील त्यांचा विश्वास आणि सर्वसामान्य जनतेच्याबाबत असलेली बांधिलकी ही दादांची कायमची शिदोरी आहे.
दादा आपल्यात नसले पण त्यांचे विचार त्यांची मुल्य आणि त्यांची कामाची पध्दत नेहमीच मार्गदर्शक ठरणार आहे. दादांची जागा कुणीच घेऊ शकणार नाही आणि हे वास्तव आहे. परंतु त्यांचा विचार त्यांनी दाखवलेला विकासाचा मार्ग आणि सामान्य माणसांबद्दल असलेली त्यांची बांधिलकी हिच आपल्या पक्षाची सर्वात मोठी ताकद आहे.
दादांच्या पश्चात राष्ट्रवादी काँग्रेस परिवार एक कुटुंब म्हणून माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलात याची मला जाणीव आहे. आणि अभिमानसुध्दा आहे. याची जबाबदारी किती मोठी आहे हेही मला समजत आहे असेही सुनेत्रा अजित पवार म्हणाल्या.
तीन वर्षापूर्वी आदरणीय दादांनी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची धुरा सांभाळली. त्यांना अवघा अडीच वर्षाचा कालावधी मिळाला. हा कालावधी मर्यादित असला तरी त्यांनी पक्षाला राष्ट्रीय स्तरावर वेगळी ओळख मिळवून दिली आहे.
दादांची ओळख केवळ राजकारणी, समाजकारणी म्हणूनच नव्हती तर सर्वसामान्यांसाठी आपल्या जीवाभावाचा माणूस… कामाचाच माणूस… आणि हक्काचा माणूस अशी होती.
राज्याचे अर्थमंत्री म्हणून दादांनी सादर केलेले त्यांचे अर्थसंकल्प हे राज्याच्या विकासाचे दस्तऐवज आहेत. शेतकरी, कष्टकरी, महिला, युवक, उद्योग, सहकार, कृषी, ग्रामीण विकास आणि पायाभूत सुविधांसाठी काम केले. महाराष्ट्राच्या प्रगतीचा ध्यास हेच त्यांच्या जीवनाचे ध्येय होते आणि ते त्यांनी अखेरच्या क्षणापर्यंत जपले याची आठवणही सुनेत्रा अजित पवार यांनी करुन दिली.
आज आपण सत्तेत आहोत. महायुती सरकारच्या माध्यमातून राज्यात आपण लोककल्याणकारी निर्णय घेत आहोत. दादांच्या दूरदृष्टीतून साकारलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमुळे राज्यातील लाखो महिलांना आर्थिक पाठबळ देण्यात आले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाराष्ट्र हितासाठी राष्ट्रीय प्रवाहाशी जुळवून काम करत असताना महाराष्ट्र धर्माची लढाई कायम लढत राहिल याची ग्वाही देतानाच अल्पसंख्याक, मागासवर्गीय, ओबीसी, आदिवासी समाजासह प्रत्येक समाजघटकाला सुरक्षित वाटेल अशी सामाजिक भावना रुजवणं ही आपणा सर्वांची जबाबदारी आहे.
राजकारणाच्या नावाखाली जातीजातीमध्ये, धर्माधर्मात फारकत करणार्या प्रवृत्तींना राष्ट्रवादी काँग्रेस कधीच थारा देणार नाही. सर्व समाजघटकांनी गुण्यागोविंदाने नांदावे असा प्रयत्न असणार आहे. त्यासाठी राजकीय तडजोड करावी लागली तरी आपण त्याची तयारी ठेवली पाहिजे असेही सुनेत्रा पवार यांनी नमूद केले.
आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना आपल्याला सामोरे जायचे आहे. त्यासाठी पक्षाचे ज्येष्ठ नेते, लोकप्रतिनिधी, संघटना पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी निवडणूक जिंकण्यासाठी नियोजनपूर्वक कामाला लागले पाहिजे. येणाऱ्या काळात मतदार पुनर्रचनेमुळे विशेषतः शहरी भागाची संख्या मोठ्याप्रमाणात वाढणार आहे.
त्यामुळे ग्रामीण व शहरी भागात पक्षाची ताकद अधिक मजबूत करण्यासाठी विशेष नियोजन आणि प्रभावी कार्यक्रम राबवण्याची आवश्यकता असणार आहे. मतदार याद्यांच्या विशेष पडताळणीत पक्षाच्यावतीने नियोजित केलेले बीएलए यांनी निवडणूक आयोगाच्या अधिकार्यांशी समन्वय साधून अत्यंत अचूक आणि जबाबदारीने काम करावे.
मतदारयादी हा निवडणूक प्रक्रियेचा आत्मा आहे. आपल्या पक्षाचा एकही हक्काचा मतदार तांत्रिक कारणांमुळे किंवा दुर्लक्षामुळे वाया जाणार नाही यासाठी सर्व नेते, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि प्रत्येक कार्यकर्त्यांनी गांभिर्याने लक्ष घालून ‘माझा बुथ माझा गाव’ या संकल्पनेत उतरून काम करावे अशा सूचना सुनेत्रा अजित पवार यांनी दिल्या. बुथ पातळीवर प्रभावीपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा योग्य सन्मान राखला जाईल त्यांना न्याय दिला जाईल याची ग्वाही सुध्दा सुनेत्रा अजित पवार यांनी दिली.
प्रत्येक कार्यकर्ता हा पक्षाचा ऑक्सिजन आहे, पक्षाची खरी ताकद आहे. मोठया मोठया शहरातच नसते तर गावागावातील, गल्ली बोळातील कार्यकर्त्यांच्या कष्टात असते. आपण सगळ्यांनीच लोकसंग्रह वाढवणं लोकांच्या समस्या समजून घेणे व त्या सोडवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणे ही प्रत्येक पदाधिकाऱ्यांची जबाबदारी आहे. संघटन मजबूत करण्यासाठी आजपासूनच कामाला लागले पाहिजे. गाव, वाडी, वस्ती, शहर आणि बुथ स्तरावर संघटन मजबूत केले पाहिजे. आपल्याला प्रत्येक बुथवर कार्यकर्त्यांची चांगली फळी निर्माण केली पाहिजे असेही सांगितले.
पक्षात ज्येष्ठता सन्मान आवश्यक आहेच याचबरोबर नव्या पिढीला संधी देणे हेही महत्त्वाचे आहे. ज्येष्ठांचा अनुभव आणि युवकांची ऊर्जा याचा समतोल आणि समन्वय हीच आपल्या यशाची गुरुकिल्ली आहे. ज्येष्ठांचा आदर, महिलांचा सन्मान, युवकांना आधार या त्रिसूत्रीनुसारच पक्षाची भविष्यात वाटचाल राहणार आहे हेही सुनेत्रा अजित पवार यांनी स्पष्ट केले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून गेल्या चार महिन्यांत मी ही जबाबदारी अतिशय वेगळ्या परिस्थितीमध्ये घेतली.ही जबाबदारी घेत असताना नक्कीच येणार्या सर्वच गोष्टींची मला जाणीव आहे. पक्षाला सर्वोच्च प्राधान्य देऊन आदरणीय दादांच्या पावलावर पाऊल ठेवून काम करण्याचा प्रयत्न करत आहे.प्रत्येक कार्यकर्त्याची निष्ठा, परिश्रम माझ्या लक्षात आहे.
याचवेळी प्रत्येकाला न्याय मिळेल. याची खात्री देतानाच आतापर्यंत पक्षामध्ये जे घडलं… प्रत्येकाला समजून घेतलं… सावरून घेतलं दादांनी त्यांच्या हयातीत सगळ्यांना समजून घेतले. अनेकांचे हट्ट पुरवले प्रेम केले. मानसन्मान दिला. पदे दिली. जे हवे ते दिले. यापुढे पक्षाच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देईन. कुणाचाही अनावश्यक हस्तक्षेप यामध्ये असेल तर नक्कीच विचार केला जाईल असा इशाराही दिला.
दादा पक्षहितासाठी कठोर निर्णय घेत होते तसेच यापुढे कठोर निर्णय घेण्यास खरंतर माझ्या स्वभावानुसार जड जाईल पण नक्कीच न्याय देण्यासाठी दादांच्या पावलावर पाऊल ठेवत प्रयत्न करणार आहे. पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी, सर्वच सहकारी पक्षहिताच्या निर्णयास माझ्यासोबत कायम असतील आणि साथ देतील. प्रत्येकाने अधिक जागरूकपणे काम करण्याची अपेक्षा आहे. पक्षाची बदनामी होणार नाही याची जबाबदारी माझ्यासह आपल्या सर्वांची आहे. विविध मंडळावर नियुक्त्या करताना पक्षनिष्ठा आणि पक्ष संघटन हे महत्वाचे निकष विचारात घेतले जातील. महामंडळासाठी पक्षाकडे अर्ज केले असतील त्यांचा नक्कीच विचार करु. त्यामुळे काळजी करण्याचे कारण नाही. पात्रता आणि गुणवत्ता तपासली जाईल. पक्षासाठी किती वर्षे काम केले त्यापेक्षा त्याकाळात पक्षाला किती पुढे नेले याचा नक्कीच विचार केला जाईल. काही वेळा तडजोडी कराव्या लागतात परंतु पक्षाच्या निष्ठावान कार्यकर्त्यांवर अन्याय होणार नाही याची काळजी घेतली जाईल असेही सुनेत्रा पवार यांनी नमूद केले.
बारामतीच्या विधानसभा पोटनिवडणुकीत आपल्या पक्षाने देशातील आजपर्यंतचे सर्वच विक्रम मोडलेले आहेत. दादांवर जीवापाड प्रेम करणाऱ्या माझ्या बारामतीकरांचा मला खरोखर सार्थ अभिमान आहे. दादांनी बारामतीत उभ्या केलेल्या विकासाच्या डोंगरामुळे हे मला प्रचंड यश मिळाले आहे. याची मला पूर्ण जाणीव आहे. माझ्यावर दाखवलेला विश्वास माझ्या कामातून सिध्द करून दाखवेन असा विश्वास सुनेत्रा अजित पवार यांनी व्यक्त केला.
प्रत्येक निवडणुकीत मतदार यादी महत्त्वाची असून त्यादृष्टीने सर्वांनी काम करायचे आहे असे सांगतानाच बदलत्या महाराष्ट्रात ग्रामीण भागात राष्ट्रवादी लक्ष घालत आला आहे मात्र ग्रामीण भागाची नाळ असलेला हा पक्ष असल्याने तितकेच शहरीकरण झालेले आहे. याकडेही लक्ष देण्याची गरज आहे. मुंबई, पुणे, ठाणे शहरात बदल दिसत आहे. उद्याची निवडणूक शहरीकरणावर होणार आहेत याकडे लक्ष देण्याची गरज आहे असे मार्गदर्शन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल यांनी वर्धापन दिनाच्या निमित्ताने कार्यक्रमात केले.
याच षण्मुखानंद सभागृहातून पक्षाचा जन्म झाला याची आठवण प्रफुल पटेल यांनी करुन दिली. शिवाय राष्ट्रवादी काँग्रेस की देशमे अलग पहचान बनी आहे. पार्टी को पहिले चुनाव मे राष्ट्रीय पार्टी की पहचान मिली हे सांगतानाच अनेक राज्यात आपले आमदार, खासदार निवडून आले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी का व्याप पुरे देशमे बढा है… अरुणाचल और नागालॅंड और एक नया राज्य आणा चाहिए तो हम राष्ट्रीय पक्ष की फिर से मान्यता दिला सकते हैं. एक राज्य मे चार विधायक चुन के लायेंगे तो राष्ट्रीय पार्टी का दर्जा मिलेगा असेही प्रफुल पटेल म्हणाले.
आज आपल्यात दादा नाहीत. एक क्षण नाही की दादांची आठवण आली नाही. दादांनी जो विचार दिला त्या विचाराने वाटचाल करुया. त्यांची आठवण मनात ठेवत त्यांच्या विचारावर आपल्याला चालायचे आहे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी केले.
नव्या पिढीला दादांचे योगदान कशापध्दतीचे होते हे माहित असायला हवे यासाठी दादांचा कार्याचा पट सुनिल तटकरे यांनी सांगितला.
२००४ मध्ये सर्वाधिक जागा मिळवल्या होत्या त्यावेळी सर्वाधिक जागा त्याचा मुख्यमंत्री हे ठरवले गेले असते तर त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचा मुख्यमंत्री झाला असता याचा पुन्हा एकदा पुनरुच्चार सुनिल तटकरे यांनी केला. याशिवाय एक क्रमांकाचे स्थान कुणी हिरावून घेतले नसते. इतकं काम दादांनी केले होते हेही आवर्जून सुनिल तटकरे यांनी सांगितले.
बुधवारी दिल्लीत एनडीएच्या बैठकीला आम्ही उपस्थित होतो. यामागे दादांच्या त्यागाची भावना होती हे लक्षात घेतले पाहिजे असेही सुनिल तटकरे म्हणाले.
सत्तेत सहभागी होऊया असे पत्र आमदारांनी शरद पवारांना दिले होते. त्या यादीत कुणाचे पहिले नाव होते याचा कागद शोधून काढा असे नाव न घेता सुनिल तटकरे यांनी टोला लगावला.
२ जुलैला दादांनी वेगळा निर्णय घेतला. शिव – शाहू – फुले – आंबेडकरांच्या विचार घेऊन एनडीएमध्ये सहभागी होण्याचा क्रांतिकारी निर्णय घेतला गेला. दादांनी अनेक विक्रम केले. चंद्र – सुर्य असेपर्यंत दादांनी आणलेल्या लाडकी बहीण योजनेला थांबवू शकत नाही. राज्यात या योजनेला लाडक्या बहिणींचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. टिका टिप्पणी होत राहिल पण जनमानसात आमचे स्थान आहे असेही सुनिल तटकरे यांनी स्पष्ट केले.
दादांच्या अकाली मृत्यू झाल्यानंतर दादांबद्दल देशभरात आत्मियता होती हे लक्षात आले. डोंगराएवढे दु:ख बाजूला ठेवून वहिनी तुम्ही पक्षासोबत उभे राहण्याचा निर्णय घेतलात. आज वहिनींच्या पाठिशी आपल्याला उभे राहायचे आहे असे आवाहनही सुनिल तटकरे यांनी केले.
राष्ट्रवादी काँग्रेस आपल्या अव्वल स्थानासह बोनस गुणासहीत यश येत्या कालावधीत मिळवेल. यावेळी सुनिल तटकरे यांनी चतुरस्र कबड्डीचा खेळाडू म्हणून वय वर्षे ८० असलेल्या छगन भुजबळ यांच्या कामाचे कौतुक केले. त्यामुळेच छगन भुजबळ तुम्हाला वहिनींच्या पाठिशी उभा राहण्याची गरज आहे. आमच्या संघाचे नेतृत्व वहिनी करत आहेत त्यामुळे आपला संघ आगामी काळात नक्कीच विजयी होणार आहे असेही सुनिल तटकरे यांनी स्पष्ट केले.
उद्याची वाटचाल योग्य पद्धतीने करायची आहे. दादांच्या प्रबळ विचाराने काम करायचे आहे. व्यक्तिगत विचार न करता पक्षाच्या भवितव्याचा विचार करून काम करा. दादांनी सर्व क्षेत्रात ठसा उमटवला तोच ठसा आपला प्राण असून त्याअनुषंगाने काम करण्याचे कार्यकर्त्यांना सांगितले.
२२ जुलै रोजी दादांची जयंती असून ही जयंती राज्यातील प्रत्येक कानाकोपऱ्यात मोठया प्रमाणात साजरी करुया असे आवाहन सुनिल तटकरे यांनी केले.
जनतेत नेहमीच जयघोष होणारा दादा आपल्यात नाही. त्यामुळे आपल्यावर फार मोठी जबाबदारी पडली आहे. आज संकल्प करावा लागणार आहे. आणि मग संघर्ष आणि नंतर दादांच्या प्रती समर्पण करावे लागणार आहे असे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ आपल्या भाषणात म्हणाले.
ए – १० मधील बंगल्यात इतिहास घडला याची इत्थंभूत माहिती यावेळी भुजबळ यांनी सांगितली.सफर मुश्कील था लेकीन… या शायरीतून छगन भुजबळ यांनी पक्षाचा खडतर प्रवास सांगितला.
आमचे बांधव पक्षासाठी सतत लढले. आमच्या पक्षात या अशा ऑफर दिल्या गेल्या परंतु फुले – शाहू – आंबेडकरांचा विचार घेऊन पुढे जाणार असल्याचे त्यांना सांगितले.
सर्व समाजांना न्याय देणारा सर्व समाजाला पुढे नेणारा राष्ट्रवादी पक्ष आहे. अंकुर वाढत असताना वटवृक्ष केला त्या अजितदादांना खरे श्रेय जाते. दादांनी दिलेले योगदान शब्दात सांगणे कठिण आहे. आज संधी आहे त्या संधीच सोने करायचे की माती करायचे हे तुमच्या हातात आहे असेही छगन भुजबळ म्हणाले.
स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी राजकारण हे समाजपरिवर्तनाचे साधन आहे असे सांगितले होते. पक्षापेक्षा कुणी मोठे नाही. खेळात राजकारण आणू नका आणि राजकारणाचा खेळ करु नका. पक्ष म्हणजे तुम्ही – आम्ही आणि कार्यकर्त्यांचा समूह म्हणजे पक्ष आहे. सुनेत्रा वहिनींच्या नेतृत्वाखाली आता काम करायचे आहे. मतभेद असू शकतात मनभेद नाहीत असेही छगन भुजबळ यांनी स्पष्ट केले.
पदे ही अळवावरचं पाणी असतं ते कधीच वितळून जाऊ शकते.ना मंजिलसे डरेंगे… या शायरीतून छगन भुजबळ यांनी आपला इरादा स्पष्ट केला.
राष्ट्रवादी काँग्रेस का झेंडा लेके चले थे और आखिरी तक लेके चलेंगे… हेही आवर्जून छगन भुजबळ यांनी सांगितले.
समर्पण… संघर्ष आणि संकल्प यासाठीच आहे की २७ वर्षात पक्षाला अनेकांचे योगदान लाभले आहे मात्र पक्षासाठी सर्वाधिक योगदान दादांचे आहे हे विसरता येणार नाही असे माजी मंत्री धनंजय मुंडे म्हणाले.
सोन्याच्या अंगठीत हिरे घडवावे असे कार्यकर्ते दादांनी राष्ट्रवादीत घडवले आहेत. आणि आज ते राष्ट्रवादी पक्ष एक नंबरवर नेण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्यासाठी आपल्याला संघर्ष करावा लागणार आहे आणि तो आपण कराल कारण आपण दादांचे कार्यकर्ते आहोत असे आवाहन धनंजय मुंडे यांनी केले.
स्टेजवर १२ खेळाडू आहेत पण समोर बसलेले सर्व खरे खेळाडू आहेत. त्यांना ही मॅच खेळायची आहे. तुमच्या भावना मी इथे मांडल्या आहेत. सुर्यकुमार यादव ज्याने वर्ल्डकप जिंकून दिला त्याला आज बाहेर बसावे लागते पण जो १५ वर्षाचा खेळाडू सुर्यवंशी आहे त्याला संधी मिळाली आहे हे लक्षात ठेवायचे आहे असेही धनंजय मुंडे म्हणाले.
दादांचे पुरोगामीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी संकल्प करा आणि वहिनींच्या नेतृत्वाखाली एक नंबरचा पक्ष करायचा आहे असे आवाहन धनंजय मुंडे यांनी केले.
कार्यक्रमात अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आदींनी आपले विचार मांडले.
यापूर्वी अजितदादा पवार यांच्या कार्यावरील चित्रफीत दाखवण्यात आली. त्यानंतर नवनिर्वाचित खासदार आणि आमदार यांचा सत्कार करण्यात आला. एसआयआरविषयी एक चित्रफीतही दाखवण्यात आली.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांचे स्वागत करण्यात आले. तत्पूर्वी महामानवांच्या प्रतिमांना अभिवादन करण्यात आले.
या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे, ज्येष्ठ नेते आणि अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ, ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री दिलीप वळसे पाटील, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, माजी मंत्री धनंजय मुंडे, युवा नेते खासदार पार्थ पवार, अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, युवा नेते जय पवार, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, महिला व बालविकास मंत्री अदितीताई तटकरे, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, ज्येष्ठ नेते व माजी मंत्री नवाब मलिक, आदींसह पक्षाचे आमदार, खासदार, माजी मंत्री, देशभरातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते. षण्मुखानंद सभागृह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी तुडुंब भरून गेले होते.