ताज्या बातम्या

गंगाई बाबाजी आदर्श पत्रकार, आदर्श सामाजिक कार्यकर्ता व आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण संपन्न

By admin

December 31, 2025

यावर्षीपासून आष्टी येथे इंग्रजी,मराठी भाषेतून वारकरी शिक्षण देणारी शाळा सुरू करणार :- माजी आ.भीमराव धोंडे

आष्टी (प्रतिनिधी)

शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने यावर्षीपासून आष्टी येथे ह.भ.प ज्ञानेश्वर माऊली महाराज चाकरवाडीकर यांच्या मंदिर आवारात इंग्रजी, मराठी भाषेतून वारकरी शिक्षण देणारी शाळा सुरु असल्याची घोषणा शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष तथा आष्टी पाटोदा शिरूरचे माजी आमदार भीमराव धोंडे यांनी केली.

आपल्या आई-वडिलांच्या स्मृती प्रित्यर्थ भगवान महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित गंगाई बाबाजी आदर्श शिक्षक, आदर्श सामाजिक कार्यकर्ता व आदर्श पत्रकार पुरस्कार वितरण सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.

सौ, दमयंतीताई धोंडे, शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष तथा डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे सिनेट सदस्य डॉ.अजयदादा धोंडे, सौ.अक्षदाताई धोंडे, राजेंद्र धोंडे, प्राचार्य डॉ. दत्तात्रय वाघ, माजी सभापती नियामत बेग, जेष्ठ पत्रकार उत्तम बोडखे, संतोष भैय्या चव्हाण, प्रफुल्ल सहस्रबुद्धे, भीमराव गुरव, प्रवीण पोकळे, अविनाश कदम, राजेंद्र लाड,शरद तळेकर,प्रा.डॉ. आशाताई चाटे, भागवत खाडे आदी मान्यवर यावेळी विचार पिठावर उपस्थित होते.

यावेळी बोलताना माजी आ. भीमराव धोंडे म्हणाले की, आपल्या महाराष्ट्राला वारकरी संप्रदायाची मोठी परंपरा लाभली आहे.या परंपरेचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी आष्टी येथे २ एकर जागेवर भव्य वारकरी शिक्षण संस्था या वर्षीच्या जून महिन्यापासून सुरू करण्यात येणार आहे.आष्टी,पाटोदा, शिरूर तालुक्यातील ग्रामीण भागातील गोरगरीब,शेतकरी, कष्टकरी,कामगार यांची वारकरी संप्रदायाच्या शिक्षणाची आवड असणाऱ्या मुलांना, त्याचबरोबर पब्लिक स्कूल मधील विद्यार्थी विद्यार्थिनींना येथे वारकरी संप्रदायाचे सखोल प्रशिक्षण देण्यात येईल. या शाळेतून घडलेले वारकरी भविष्यात इंग्रजी माध्यमातून कीर्तन, प्रवचन सेवा करतील. आपल्या आई-वडिलांचा सर्वांनी सन्मान केला पाहिजे.

आई-वडिलांचे उपकार लक्षात ठेवले पाहिजेत.शिक्षकांनी चांगले शिक्षण देण्याचे काम करावे. कारण जगात गुरूला सर्वश्रेष्ठ मानले जाते. मातृभाषेतून शिक्षण देणे ही आवश्यक आहे.कारण मातृभाषेतील शिक्षणामुळे मुलांवर चांगले संस्कार होतात. पत्रकारांनी समाजातील सत्य निर्भीडपणे आपल्या बातम्यांमधून मांडावे.यशाला कुठल्याही प्रकारचा शॉर्टकट नसतो तर यशाला कष्टाची भूक असते असे ते म्हणाले. शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष तथा डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे सिनेट सदस्य डॉ.अजयदादा धोंडे म्हणाले की,गंगाई बाबाजी महोत्सवाच्या माध्यमातून गेल्या २५ वर्षापासून या कार्यक्रमाचा दर्जा टिकवण्याचा प्रयत्न केला जात आहे. कुठल्याही जातीपातीचा किंवा धर्म,पंथाचा विचार न करता चांगले काम करणाऱ्या व्यक्तींना गंगाई बाबाजी आदर्श पुरस्कार देऊन दरवर्षी सन्मानित केले जाते.

आपण ज्या भागात राहतो त्या भागात आपल्या हातून चांगले काम झाले पाहिजे. यासाठी हा पुरस्कार प्रेरणादायी ठरतो. शिक्षक हा समाजातील अनेक पिढ्या घडवतो. त्यामुळे शिक्षकाला नेहमीच आई-वडिलांपेक्षाही मोठे स्थान आहे असे ते म्हणाले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते माजी सैनिक रणजीत चव्हाण,रविंद्र फुंदे, आयबीएन लोकमतचे प्रतिनिधी पत्रकार सुरेश जाधव यांनी आपले मनोगत व्यक्त केले. प्राचार्य डॉ.दत्तात्रय वाघ यांनी प्रास्ताविक केले. प्राचार्य बाळासाहेब खेमनर,उपप्राचार्य डॉ.ज्ञानदेव वैद्य,प्रा. डॉ.सुरेश फुले यांनी पुरस्कार वितरण समारंभाचे सूत्रसंचालन केले. तर प्राचार्य निशिगंध यांनी आभार मानले.

यावेळी पत्रकार सुरेश जाधव,शितल कुमार मोटे,अशोक शिंदे, अजय जोशी, हरिदास शेलार, संतोष सानप, जावेद पठाण, अण्णासाहेब साबळे,गहिनीनाथ पाचबैल,विनोद जिरे यांना गंगाई बाबाजी आदर्श पत्रकार पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले तर सामाजिक क्षेत्रातील कार्याबद्दल रणजित चव्हाण, श्रीमती वर्षा शेरकर, रहेमान सय्यद, रावसाहेब पिंपळे, सुखदेव पोकळे, महादेव भवर,गणेश आंबेकर यांना गंगाई बाबाजी आदर्श सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. अर्जुन घुगे, प्रा. अजित इथापे, कल्याण वाल्हेकर, संजय सोले, रवींद्र फुंदे,श्यामसुंदर घाडगे, आत्माराम बारवकर,मुकुंद लगड,सुहास साळवे, मल्हारी गर्जे,श्रीमती नीता आघाव,राजू सानप, भानुदास आवळे, सुजाता जाधव, अशोक इथापे, तुकाराम बारामते, श्रीमती मिनाज शेख, पद्मनाथ गर्जे, श्रीमती चंद्रकला लाड, श्रीमती सारिका घाटोळे, सुरेश तळेकर, श्रीमती सायली चौधरी व दिनकर देडे यांना माध्यमिक व उच्च माध्यमिक क्षेत्रातील शैक्षणिक कार्याबद्दल गंगाई बाबाजी आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.