बीड दि.१३
Beed mahavitaran andolan news बीड जिल्ह्यातील महावितरणच्या अनागोंदी कारभार, कागदोपत्री मान्सूनपूर्व दुरुस्ती, ऐच्छिक असतानाही स्मार्ट मीटरची सक्ती, विजेच्या धक्क्याने झालेल्या माऊली गोंडे आणि कृष्णा उगले या दोन शेतकऱ्यांच्या मृत्यूची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई तसेच त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत आणि गेवराई उपविभागीय कार्यालयांतर्गत ५ कोटी रुपयांच्या घोटाळ्याची चौकशी करून दोषींवर करण्याच्या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते तथा बीड जिल्हा माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे मुख्य प्रचार प्रमुख डॉ. गणेश ढवळे (लिंबागणेशकर) यांच्या नेतृत्वाखाली आज सोमवारी (दि.१३) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महावितरणविरोधात घोषणाबाजी करत बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले.
आंदोलनानंतर जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री सुनेत्रा पवार, महावितरणचे कार्यकारी संचालक (मुंबई) आणि मुख्य अभियंता, महावितरण परिमंडळ, लातूर यांना निवेदन देण्यात आले.
चिंचोटी (ता. वडवणी) येथील माऊली दिलीप गोंडे (वय २६) व हाजीपूर (ता. शिरूर कासार) येथील कृष्णा मच्छिंद्र उगले (वय ३०) यांच्या विजेच्या धक्क्याने झालेल्या मृत्यूची सखोल चौकशी करावी.
संबंधित दोषींवर कठोर कारवाई करून मृतांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत द्यावी.
मान्सूनपूर्व दुरुस्तीच्या नावाखाली झालेल्या कामांची चौकशी करून जबाबदारांवर कारवाई करावी.
ऐच्छिक असलेल्या स्मार्ट मीटरची सक्ती तात्काळ थांबवावी.
गेवराई उपविभागीय कार्यालयातील कथित ५ कोटी रुपयांच्या घोटाळ्याची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कारवाई करावी.
आंदोलनात माहिती अधिकार कार्यकर्ते शेख युनूस, शेख मुबीन, शेख मुस्ताक, सामाजिक कार्यकर्ते रामनाथ खोड, बाळासाहेब मोरे पाटील (प्रांताध्यक्ष, शिवशक्ती-भीमशक्ती विचारमंच), माजी सैनिक अशोक येडे (जिल्हाध्यक्ष, आम आदमी पार्टी), सय्यद सादेक ( बीड शहराध्यक्ष आम आदमी पार्टी बीड),रामन जमाले (जिल्हाध्यक्ष, इंटक), प्राचार्य डी. जी. तांदळे (मार्गदर्शक, मराठवाडा शिक्षक संघ), ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाजीराव ढाकणे, सामाजिक कार्यकर्ते भिमराव कुटे, हनुमान घोडके, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते एल.आर. चाटे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा मार्गदर्शक तथा ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. संजय तांदळे यांच्यासह विविध सामाजिक व राजकीय संघटनांचे पदाधिकारी सहभागी झाले.
यावेळी डॉ. गणेश ढवळे यांनी बीड शहरातील रस्त्यांच्या मध्यभागी असलेले वाहतुकीस अडथळा ठरणारे रोहित्र व वीज खांब तातडीने सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्याची मागणीही केली. तसेच महावितरणच्या कामकाजात पारदर्शकता आणून नागरिकांच्या जीविताशी संबंधित प्रश्नांबाबत प्रशासनाने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.