ताज्या बातम्या

सोशल मीडियावरील स्टोरीतून रक्तरंजित संघर्ष; बीडच्या रुई नालकोल गावात युवकांच्या दोन गटांत हाणामारी, एकाचा मृत्यू

By admin

February 17, 2026

आष्टी ,प्रतिनिधि

सोशल मीडियाचा अतिरेक आणि क्षुल्लक कारणांवरून वाढणारे वाद पुन्हा एकदा जीवघेणे ठरल्याची घटना नालकोल गावात घडली आहे. बीड जिल्ह्यातील रुई नालकोल या गावात सोशल मीडियावर टाकलेल्या एका स्टोरीवरून युवकांच्या दोन गटांमध्ये तीव्र वाद निर्माण झाला.

प्रारंभी शाब्दिक वादाने सुरुवात झालेली ही बाब काही वेळातच हातघाईपर्यंत पोहोचली. दोन्ही गटांनी एकमेकांवर लाठी-काठ्या तसेच धारदार शस्त्रांनी हल्ला केल्याने परिसरात एकच गोंधळ उडाला. या भीषण हाणामारीत एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर दोन युवक गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दीपक शिवाजी नालकोल वय 20 वर्षे असे मयत तरुणाचे नाव आहे.गंभीर अस्वस्थतेत असताना त्याला दवाखान्यात नेण्यात आले,मात्र उपचारापूर्वीच त्याचे निधन झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.उर्वरित दोन जखमींना अहिल्यानगर येथे खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

घटनेची माहिती मिळताच आष्टी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय नरवाडे,विक्रांत हिंगे, पोलीस उपनिरीक्षक कृष्णा नरवडे यांनी घटनास्थळी भेट दिली.

घटनेनंतर संपूर्ण गावात तणावपूर्ण शांतता पसरली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.

पोलिसांकडून प्राथमिक तपास सुरू असून सोशल मीडियावरील संबंधित स्टोरी, व्हिडिओ आणि संदेशांचा तपशीलवार अभ्यास केला जात आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

ही घटना सोशल मीडियाच्या गैरवापरामुळे निर्माण होणाऱ्या गंभीर परिणामांचे जिवंत उदाहरण ठरत असून युवकांनी संयम राखण्याचे आणि जबाबदारीने सोशल मीडियाचा वापर करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.