अमोलक ऋषींजी 

विशेष वृत्त

स्वातंत्र्यपूर्व काळात धर्म प्रसारातून शिक्षण गंगा निर्माण करणारे शास्रोद्धारक अमोलक ऋषींजी 

By admin

September 13, 2024

लेखन : मनोज सातपुते,मोतीलाल कोठारी विद्यालय कडा

 13 सप्टेंबर  परम पूज्य अमोलक ऋषींजी यांची  पुण्यतिथी.आज त्यांची 88 वी पुण्यतिथी. एक शतकापूर्वी जैन धर्माच्या प्रचारासाठी ते बीड जिल्ह्यात आले आणि त्यांनी अमोलक जैन बोर्डिंगची स्थापना केली.बोर्डिंग चे अमोलक जैन शिक्षण प्रसारक मंडळात रुपांतर झाले. शंभर वर्षापूर्वी स्वातंत्र्यपूर्व काळात शिक्षणाचे स्वप्न त्यांनी पहिले आणि मोठ्या शिक्षण संस्थेची मुहूर्तमेढ रोवली.या शिक्षण संस्थेतून अनेक विद्वान,पंडित,प्रशासकीय अधिकारी बनले.

 त्यांनी भारतभर भ्रमण केले. 25 डिसेंबर 1924 मध्ये त्यांनी कडा येथे कडा बोर्डिंग सुरु केली. कडा बोर्डिंगचे अमोलक जैन विद्या प्रसारक संस्थेत रुपांतर झाले.परम पूज्य अमोलक ऋषींनी सुरु केलेली शिक्षण गंगा अविरत पणे वाहत आहे. या निमित्ताने त्यांच्या कार्याला प्रणाम..

२५ डिसेंबर १९२४ चा प्रसंग. परमपूज्य अमोलक ऋषीजी कडा गावात जैन स्थानकात चातुर्मासानिमित्त आले होते. पर्युषण पर्वाचा काळ याच काळात त्यांनी कडा येथे जैन मुलांसाठी बोर्डिंग सुरु करण्याचे ठरविले आणि २५ डिसेंबरला जैन विद्यार्थ्यांसाठी  बोर्डिंग सुरु झाली. हा दिवस कडा सह आष्टी तालुक्यातील नागरिकांसाठी अविस्मरणीय ठरला.धर्मप्रसार निमित्ताने भारत भ्रमण करणाऱ्या महापुरुषाने या भागाला शिक्षणाचे महत्व पटवून छोटीशी बोर्डिंग उभी केली. त्या महान जैन शास्रोद्धारक अमोलक ऋषिंची पुण्यतिथी.

त्यानिमित्ताने त्यांच्या कार्याला उजाळा देण्याचा हा प्रयत्न.

जीवन चरित्र महापुरुषोके हमे नसीहत करते है !हम भी अपना अपना जीवन स्वच्छ रम्य कर सकते है !!

महापुरुषांच्या चरित्रातून नेहमीच प्रेरणा मिळत असते. यातून जीवन जगण्याचे मार्ग मिळत असतात.हे महापुरुष प्रकाश स्तम्भासारखे असतात जे नेहमी समाजाला दिशा दर्शक ठरतात. असेच जैनाचार्य, शास्रोद्धारक आणि अध्यात्मिक जगातील जैन धर्माला दिशा देणारे गुरु म्हणून परम पूज्य अमोलक महाराज यांची महती आहे.

जैन धर्मातील नागरिकांना धर्म साहित्य आणि धर्मग्रंथ सहज समजावे म्हणून त्यांनी हिंदीत भाषांतर केले. ज्या काळात जैन धर्मातील नागरिकांना धार्मिक बाबी समजणे कठीण होते त्यावेळी त्यांनी विविध धर्म ग्रंथ हिंदीत अनुवादित केले आणि ते जैन धर्मीय नागरिकांना खुले झाले.

 जैन साधू हे भारत भ्रमण करत असतात, या काळात त्यांचे वास्तव हे जैन स्थानकात असते हे स्थानके त्यांची प्रवचनाची आणि धार्मिक उपदेशाची केंद्रे असतात.पुणे जिल्ह्यातील घोडनदी येथील चातुर्मास काळात ‘जैनतत्वप्रकाश’ नावाचा धर्मग्रंथ त्यांनी तीन महिन्याच्या कालावधीत लिहून प्रकाशित केला.तसेच ध्यान कल्पतरू, आरोहण , तीर्थंकर चरित्र , इत्यादी विविध प्रकारच्या साहित्याची त्यांनी निर्मिती केली.त्यांची ग्रंथ संपदा १०७ हून अधिक आहे.

अमोलक ऋषींचे साहित्यिक कार्य

त्यांचे गुजराथी कन्नड मराठी आणि उर्दू भाषेत भाषांतर करण्यात आले. या साठी त्यांना हैदराबाद , बंगलोर येथील अनेक जैन धर्मीय व्यापारी बांधवांनी मदत केली . एक जैन साधूंचे लेखन उर्दू आणि इतर भाषेत अनुवादित होण्याचा हा त्याकाळातील पहिलेच जैन साधू म्हणावे लागतील.

त्यांच्या अत्युच्च कोटीच्या लेखनामुळे भारतभरातील जैन साधुमंध्ये त्यांचे स्थान अव्वल दर्जाचे होते.श्री अमोलक ऋषि यांचा जन्म भोपाळ येथील.  लहानपणापासून धार्मिकतेची ओढ असल्याने  त्यांनी बालवयातच जैन धर्माची दीक्षा घेतली आणि धर्मोद्धाराचे काम सुरु केले.स्वातंत्र्य पूर्व काळात हे सर्व करने खूप कठीण  होते त्यातच जैन साधूंना भ्रमण करने आवश्यक असते त्यामुळे या बाबतीत आपण विचार करायला नको.

भटकंती करता करता त्यांच्या ज्ञानात भर पडत गेली, समाज ,धर्म,संस्कार यांचे आकलन होऊन अल्प कालावधीत जैनाचार्य झाले. अमोलक ऋषींनी आपल्या जीवनात ब्रम्हचारी राहून जैन धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्याचे काम केले.

परंतु धर्माबरोबर मुलांना शिक्षण मिळाले पाहिजे ही त्यांची धारणा होती,ते ज्या ज्याठिकाणी जात त्या  ठिकाणी जैनधर्मातील मुलांच्या शिक्षणाबद्दल ते समाजातील जेष्ठ लोकांशी चर्चा करत असे, जैन धर्मातील अनेक दानशूर  व्यापारी मंडळीना ते शाळा उघडण्याचे आवाहन करीत त्यांच्या प्रेरणेने  अनेक ठिकाणी शाळा उभ्या राहिल्या, अनेक वेळा कडा येथे चातुर्मासाच्या निमित्ताने ते आल्यानंतर जैन धर्मातील मुले शिकली पाहिजेत असे सांगत.

बोदवड येथील चातुर्मासाच्या वेळी पाथर्डी येथे जैन शाळा उघडण्याचे ठरले, जैन धर्मातील मुलांनी धर्माचे आचरण केले पाहिजे याच उद्देशाने जैन बोर्डिंग ची सुरुवात केली . या बोर्डिंग मध्ये जैन धर्मातील मुलांना धार्मिक शिक्षणाबरोबर इतर शिक्षण देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. याला पूर्वी कडा बोर्डिंग म्हणून  ओळखले जाई.

आज या बोर्डिंग ला अमोलक जैन संस्था नावाने ओळखले जाते .त्यानंतर आज या शाळेच्या अनेक शाखा तयार झाल्या आहेत ,बालवाडी पासून ते पदवी आणि पदव्युत्तर,व्यावसायिक  शिक्षणाची सोय अमोलक ऋषीजींच्या नावाने झाली आहे. चातुर्मासाच्या निमित्ताने त्यांनी गुजरात,मध्यप्रदेश  ,राजस्थान महाराष्ट्र ,कर्नाटक आन्ध्र प्रदेश या भागात फिरले.

समाजाला एकसंघ करत शिक्षणाच्या व्यवस्था निर्माण करण्याचे ते काम करत त्याच्या दूरदृष्टीमुळे आज कडा यासाख्या छोट्याश्या गावात स्वातंत्र पूर्व काळापासून शिक्षणाची संधी उपलब्ध झाली कडा सह आष्टी तालुक्यातील जैन धर्मियांसह इतर समाजाच्या  विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्याची संधी मिळाली  आणि त्यातून अनेक कर्तृत्व संपन्न माणसे घडली.