ahilyanagar sangamner midc

ताज्या बातम्या

संगमनेर तालुक्यातील औद्योगिक वसाहतीच्या कामाची घोषणा

By admin

March 02, 2026

​शिर्डी, दि.१ मार्च :-

ahilyanagar sangamner midc संगमनेर तालुक्यात राज्य शासनाच्या माध्यमातून विविध विकासकामे वेगाने पूर्ण होत आहेत. भविष्यात तालुक्यात रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी औद्योगिक वसाहतीचे कामही लवकरच मार्गी लावले जाईल, अशी ग्वाही जलसंपदामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.

​तालुक्यातील हिवरगाव पावसा येथे जलसंपदा विभागाच्या माध्यमातून सुमारे एक कोटी रुपयांच्या निधीतून ऊर्ध्व प्रवरा उजव्या कालव्यावरील ‘एस्केप’मधून पाणी सोडण्याच्या व पुणे – नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील पथदिव्यांच्या कामाचा शुभारंभ पालकमंत्री विखे पाटील यांच्याहस्ते करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी आमदार अमोल खताळ तसेच पदाधिकारी कपिल पवार, रामभाऊ राहाणे, प्रमोद राहाणे, काशिनाथ पावसे, गुलाब भोसले, राम जाजू, जनार्दन आहेर यांच्यासह विविध पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.

​पालकमंत्री विखे पाटील म्हणाले, निळवंडे धरणाचे काम पूर्ण झाल्याने सर्वांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. यंदा मुबलक पाणी उपलब्ध असले तरी ‘अल निनो’च्या संभाव्य धोक्यामुळे जून महिन्यातील पावसाच्या प्रमाणावर धरणातील पाण्याचे नियोजन करावे लागणार आहे. राज्यातील सर्वच धरणांतील पाण्याचा ३१ ऑगस्टपर्यंतचा आढावा विभागाच्या वतीने घेण्यात येत आहे. आवर्तनाचे नियोजन योग्य प्रकारे झाल्यामुळे यंदा तालुक्यात टँकरची मागणी नाही. आमदार अमोल खताळ यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे राज्य शासनाच्या माध्यमातून तालुक्याचा पाणीप्रश्न मार्गी लागला असून वर्षानुवर्षे पाण्याची प्रतीक्षा असणाऱ्या गावांना पाणी देता आल्याचे समाधान त्यांनी व्यक्त केले.

ahilyanagar sangamner midc विविध विकासकामे

​राज्य शासन तालुक्याच्या विकासासाठी खंबीरपणे उभे आहे. हिवरगाव पावसा येथील बंधाऱ्यात आलेले पाणी व सुमारे तीन कोटी रुपयांच्या पुलाचे काम परिसरासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. विकासाच्या माध्यमातून तालुका प्रकाशमान होत असून राज्य शासनाची भूमिका जनहितासाठी कटिबद्ध आहे. रोजगाराच्या नवीन संधी निर्माण करून देण्यासाठी मोठी गुंतवणूक येत असून संरक्षण उत्पादनात जिल्ह्याची नवी ओळख निर्माण होत आहे. यातूनच तालुक्यातील औद्योगिक विकासासाठीही मोठे काम उभे करायचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

​आमदार श्री.खताळ म्हणाले, पालकमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील अनेक प्रलंबित प्रश्न सुटत आहेत. चंदनापुरी ते शिरापूर रस्त्यावरील पुलाचे काम राज्य शासनाच्या माध्यमातून मार्गी लागले आहे. तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी औद्योगिक वसाहतीसाठी जागेचा प्रश्नही लवकरच निकाली काढण्यात येईल.

याप्रसंगी प्रमोद राहाणे, राजन शिंदे व काशिनाथ पावसे यांचीही भाषणे झाली.