ताज्या बातम्या

आष्टी विधानसभा पंचनामे करुन नुकसान भरपाई देण्याची मागणी

By admin

August 15, 2021

 

आष्टी -प्रतिनिधी आष्टी विधानसभा यंदा मान्सुनपुर्व पाऊस झाला. वेळेवर व पेरणीयोग्य पाऊस झाल्याने बळीराजा सुखावला आणि खरीप हंगामासाठी पेरणी केली. पिकेही जोमात वाढली मात्र पावसाने नेहमीप्रमाणे ताण दिला आणि आता खरीपातील सर्वच पिके करपू लागली आहेत.

एक महिन्यापासून पावसाने दडी मारल्याने पिके सुकली आहेत. कापसाची वाढ खुंटली आहे. उडिद, सोयाबीन, मुग दाणे भरण्याच्या अवस्थेत आहेत तर कापूस फुले, पाते बहरत आहेत.

खरीप पिकांना ऐन फळधारणेच्या वेळी पावसाची नितांत गरज असताना पावसाचा महिनाभराची विश्रांती घेतली. पाऊस नसल्याने आष्टी तालुक्यातील एक लाख हेक्टर क्षेत्रावरील पिके धोक्यात आले आहेत.

पिकांनी माना टाकल्या आहेत. दोन ते चार दिवसात पाऊस होईल या आशेने शेतकरी पावसाची आतुरतेने वाट पाहत आहे पण पाऊस हुलकावणी देत आहे.

आष्टी विधानसभा मतदार संघात पावसाने महिनाभरापासुन दडी मारल्याने पिके करपली आहेत.

प्रशासनाने आता तात्काळ पीक नुकसानीचे पंचनामे करुन सरसकट पीकनुकसान भरपाई द्यावी अशी मागणी मा.आ.भीमसेन धोंडे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाव्दारे केली आहे.

प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनाता त्यांनी म्हटले आहे की, जुन २०२१ महिन्यामध्ये पेरणीयोग्य पाऊस झाल्याने शेतक-यांनी काळ्या आईची ओटी भरली.

पाऊसाचा सततचा लपंडाव सोसत पिके जोमाने शिवरात डौलत होती. उडिद, सोयाबीन, मुग दाणे भरण्याच्या अवस्थेत असताना पाऊसाने दडी मारल्याने खरीपातील पिके करपली आहेत.

जलसिंचनाची सोय असलेले शेतकरी पिके वाचवण्यासाठी धडपड करीत आहेत. रोग नियंत्रणासाठी व भरघोस उत्पन्नासाठी शेतक-यांनी मोठा खर्च केला आहे. सर्व प्रयत्न व्यर्थ गेले आहेत.

पावसाने पाठ फिरवल्याने शेतकरी उध्वस्त झाला. सरसकट नुकसान भरपाई द्यावी जून महिन्यातील चांगल्या पावसाने खरीप हंगामाच्या आशा पल्लवीत केल्या. पिकांना पोषक वातावरण तयार झाले.

शेतात पिके डौलात येऊन उडिद, सोयाबीन, कापूस हे पिके फळधारणेच्या अवस्थेत आहेत.

पिकांना पाण्याची नितांत गरज आहे परंतु गेल्या महिन्यापासून पावसाने दडी मारल्याने शेतकरी हतबल होऊन तोंडचे पाणी पळाले आहे.

आष्टी विधानसभा मतदार संघात पंचनामे करुन नुकसान भरपाई देण्याची मागणी

पावसा अभावी जमिनीला भेगा पडत आहेत, पिके करपली आहेत. पिके वाचविण्यासाठी जलसिंचन सोय असलेले शेतकरी पिके वाचवण्यासाठी धडपड करत आहेत परंतु ज्या शेतकर्‍यांकडे या सुविधा नाहीत त्यांना पावसावरच अवलंबून राहावे लागत आहे.

लवकर पाऊस आला नाही तर उत्पादनात मोठी घट होणार आहे. पिकांची फुल गळ होऊन माना टाकल्या आहेत.

आष्टी विधानसभा मतदार संघात शेतकर्‍यांना सरसकट आर्थिक मदत करावी अशी मागणी मा.आ.भीमसेन धोंडे यांनी केली आहे. दि.१३ आॕगस्ट नंतर पाऊस येईल असा अंदाज वर्तवण्यात आला होता मात्र तोही अंदाज खोटा ठरला आहे.

 

आणखी वाचा:उद्दिग्न चित्र-शिल्पकार प्रमोद कांबळे यांनी घेतला झाडू हातात

आष्टी तालुक्यातील खरिप पिकनिहाय पेरा

आष्टी विधानसभा मतदार संघात आष्टी तालुक्यात १ लाख १ हजार ५६० हेक्टर क्षेत्रावर पेरणी झालेली आहे. उडिद ३१हजार ९४० हेक्टर, बाजरी ११ हजार ६३४ हेक्टर, मका २ हजार १९७ हेक्टर, तुर २५ हजार १४५ हेक्टर, मुग ७ हजार ५७६ हेक्टर, कडधान्य ५०४ हेक्टर, भुईमूग ३५१ हेक्टर, तीळ ३३ हेक्टर, सोयाबीन ४ हजार ४०८ हेक्टर, कापूस १३ हजार ७१४ हेक्टर, कांदा ३ हजार ४३४ हेक्टर असा आष्टी तालुक्यात एक लाख एक हजार ५६० हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाल्याची कृषी विभागाकडे नोंद आहे.